(शिरूर अरुणकुमार मोटे): राज्यात कथित ‘लव्ह जिहाद’ तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करत सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) शिरूर येथे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासन यांनी ‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती. मात्र, जवळपास एक वर्ष उलटूनही या संदर्भात कोणताही ठोस कायदा लागू करण्यात आलेला नसल्याने शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
शासनाच्या दिरंगाईमुळे समाजात असंतोष वाढत असल्याचा आरोप करत मार्च महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात या संदर्भात कठोर कायदा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांना संरक्षण देणारा प्रभावी कायदा लागू करावा, असे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
१३ फेब्रुवारी रोजी निवेदन सादर करूनही शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई गव्हाणे, पंचायत समिती सदस्या विद्याताई भुजबळ, हिंदू जागरणचे मयूर सूर्यवंशी, हिंदू जनजागरण संस्थेचे अध्यक्ष सचिन पलांडे, शेखर भंडारी, उमेश शेळके, आबा पुरोहित, नाना लांडे, आकाश चाकणे आदी कार्यकर्ते व कार्यकर्त्या उपस्थित होते.