रांजणगाव गणपतीत किसान जागृती यात्रेत सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कन्याकुमारी ते काश्मीर हि देशव्यापी किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रांजणगावात दाखल होताच हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन त्याचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशा, घोषणाबाजी आणि भगव्या-हिरव्या पताकांनी परिसर भरुन गेला होता. या यात्रेचे नेतृत्व वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून ७ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान देशभर शेतकरी जनजागृतीचा धडाका सुरु आहे.

या भव्य शेतकरी मेळाव्यात डल्लेवाल यांनी केंद्र सरकारवर थेट प्रहार करत वातावरण पेटवले. “सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करणार” असे सांगत डल्लेवाल यांनी सरकारवर थेट हल्ला चढविला. “सरकार देशहिताच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. भारत-अमेरिका कराराबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाईल. पण ‘शेतकरी आता आत्महत्या करणार नाही तर लढा देणार’ त्यांच्या या विधानानंतर सभास्थळी घोषणांचा कडकडाट झाला. “एमएसपीला कायद्याची हमी द्या!”, “कर्जमाफी द्या नाहीतर दिल्ली घेरा!” अशा घोषणांनी वातावरण तापले.

१९ मार्चला दिल्लीला रामलीला मैदानात आंदोलन…

यावेळी डल्लेवाल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ‘१९ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदान येथे होणारे आंदोलन हे केवळ आंदोलन नसून शेतकरी अस्तित्वाची निर्णायक लढाई असेल.’

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या ठाम मागण्या मांडल्या त्या खालीलप्रमाणे 

1) MSP ला कायदेशीर हमी

संपूर्ण कर्जमाफी

2) ऊसाचा FRP दर थेट 6000 रुपये रुपये प्रति क्विंटल

3) २०१३ चा जमीन अधिग्रहण कायदा पुनर्स्थापित करणे

4) पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल

“महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे निघाले पाहिजेत,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पंजाब ते महाराष्ट्र शेतकरी शक्ती एकाच व्यासपीठावर…

पंजाब, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध नेते एकत्र आल्याने या सभेला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले होते. विविध राज्यांतील नेत्यांनी शेतकरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत सरकारला इशारा दिला की, “शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका.” महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना, ग्रामपंचायत, वारकरी संप्रदाय व विविध चळवळींच्या प्रतिनिधींनीही यात्रेला पाठिंबा दर्शवला.

संघर्षाची ठिणगी की आंदोलनाची ज्वाळा…?

रांजणगाव गणपतीत उसळलेली ही शेतकरी एकजूट केवळ स्वागतापुरती मर्यादित राहणार नाही, तर येत्या काळात ती राज्यभर संघर्षाची ज्वाळा ठरेल, अशी चर्चा सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणार की पुन्हा आश्वासनांचे गाजर दाखविणार…? याचे उत्तर आता दिल्लीच्या रामलीला मैदानावर मिळणार आहे.

या शेतकरी सभेला विविध राज्यांतील शेतकरी नेत्यांनी संबोधित केले. पंजाबमधून इंद्रजीत सिंह पन्नीवाल, संदीप सिंह खेरा, हर्षदीप सिंह गिल, सोनी सिंह ओलख; कर्नाटक मधून अभिमन्यू कोहोड, दयानंद पाटील; राजस्थान मधून युवा शेतकरी नेते जगदीश कुमार; मध्य प्रदेश मधून महेश अजनबी; तसेच महाराष्ट्रा राज्यातील जालना येथुन लक्ष्मण वडले, श्रीगोंदा येथुन अनिल घनवट , दौंड येथुन शिवाजी नांदखिले, नाशिक येथुन सीमा नरोटे, मधुसूदन पाटील महाराज (भामचंद्र डोंगर संघर्ष समिती, देहू), रांजणगाव गणपतीच्या सरपंच सुवर्णा वायदंडे, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, शिवपानंद शेत रस्ते चळवळ प्रणेते शरद पवळे, रांजणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे, अध्यक्ष, पुणे जिल्हा भीममुद्रा संघटनेचे अविनाश शिंदे, सीमाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा पवार, भूमाता ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मंगल सासवडे, चेतना भुजबळ आकाश साळुंखे, राजू लांडे (उद्योजक), रामदास बत्ते (प्रगतशील शेतकरी), तुषार कुटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी उपस्थित सर्व शेतकरी नेते, पदाधिकारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले.