शिरूर (नितीन थोरात): जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या टाकळी हाजी या गटामध्ये पंचायत समितीचे दोन गण समाविष्ट आहेत. या जिल्हा परिषद गटात सन 1962 मध्ये सत्ता विकेंद्रीत करण्याचा आणि त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या स्थापन झाल्या तेव्हापासून टाकळी हाजी गावचे माजी आमदार श्री. पोपटरावजी गावडे साहेब यांना सातत्याने नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या बरोबरीने सण 1962 ते 67 या कालावधीत मलठण गावच्या दोन प्रतिनिधींना पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली ते म्हणजे मोहनराव पाटीलबुवा गिते व श्रीमती प्रमिलाराजे धैर्यशील पवार.
शिरूर तालुक्याच्या या पहिल्याच पंचायत समितीचा पहिला सभापती होण्याचा मान रायकुमार भोगीलाल गुजर यांना मिळाला तर पहिले उपसभापती होण्याचा मान मोहनराव बाजीराव मोकाशी यांना मिळाला होता. या सुरुवातीच्या काळात हा बेट भाग अविकसित असा भाग होता. घोड आणि कुकडी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेला भाग रस्त्याची सुविधा नाही. की शिक्षणाची सोय नाही. पावसाळ्यात चार महिने तालुक्याचा संपर्क होत नसे. याच भागाला प्रथमता 1972 सली घोडनदीवर आमदाबाद येथे पुलाचे काम सुरू झाले. या भागाचा तालुक्याशी संपर्क सुरू झाला.
गावडे साहेब यांच्याबरोबर या भागातील पंचायत समितीवर यावेळी कवठे गावचे शशिकांत केशवलाल शहा व मोहनराव पाटीलबुवा गिते यांना दुसऱ्यांदा पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली. गावडे साहेबांना सभापतीपदी काम करण्याच्या संधीमुळे या भागात अनेक विकास कामे झाली याचे श्रेय निश्चितपणे त्यांना जाते. सातत्याने राजकारणात त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्या बरोबरीनेच कुटुंबातील त्यांचे चिरंजीव सोनभाऊ (सर) गावडे यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनिताताई यांनाही जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली.
काळ झपाट्याने बदलत गेला. विज्ञानाने, अज्ञान समाज वेगवान झाला. ज्या भागात एकेकाळी प्रवास म्हणजे पायी, घोडा किंवा गाडीच माहित असलेल्या भागात आता कधीतरी हेलिकॉप्टरही उतरत आहे. या भागात हुलगा, मटकी, मुग या सारखी कडधान्ये पावसावर घेतली जात. याच जमिनीत आता शेतकऱ्यांचे मुख्य पिक कांदा, ऊस, भाजीपाला पिके, हळद आणि डाळींब, आंबा, सिताफळ ते द्राक्ष उत्पादन घेताना दिसत आहे. याला तंत्रज्ञानाची जोड व सरकारी धोरणांच्यामुळे प्रत्येक सधन शेतकऱ्यांच्या दारात शेतीसाठी ट्रॅक्टर, JCB सारखी यंत्र असल्याचे दिसते.
अडचणी संपत गेल्या तस तसा माणूस माणसापासून दुरावल्याचे चित्र दिसू लागले. समाज आणि समाजकारणाबरोबर राजकारणातही हा फरक दिसू लागला. निवडणुका आल्या की उमेदवारांचा वाढलेला खर्च यामध्ये तीर्थयात्रा, खेळ पैठणीचा किंवा अगदी गावा गावात जागरण गोंधळाचे कार्यक्रम आयोजनातून अन्नदानाचे निमित्त. अलीकडच्या काळात राज्यात आणि देशात बदललेल्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रीय पक्ष असो किंवा इतर पक्ष सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाकडे आकर्षित झाल्याने इतरांचे कंबरडे मोडल्यासारखे झाले. मतदाराला आपला नेता नेमका कोणत्या पक्षात असेल याची खात्रीच येईना अशी परिस्थिती आहे.
राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घडणाऱ्या घडामोडी, आरक्षणाच्या मुद्द्यावर हक्क आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरलेले समाज, यामध्ये मागील काळात ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाजाचे चाललेले आंदोलन असेल,याच बरोबरीने धनगर समाजाचेही आरक्षण मागणीचे आंदोलन याच आंदोलनाचा फटका गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या समाजात जाती जातीमध्ये कटुता निर्माण करतो आहे का?
याच बेट भागातील लोकसंख्येचे वर्गीकरण म्हणजे एस सी, एस टी, एन टी, ओ बी सी, अल्पसंख्यांक आणि खुलाप्रवर्ग व इतर प्रत्येकालाच आपल्या प्रवर्गातला प्रतिनिधी असावा, तो हवा असतो. मात्र याच बेटभागासाठी आता मोठी स्पर्धा तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते. सत्तेत सहभागी असलेले व नसलेले पक्ष आपले उमेदवार रिंगणात उभे करणार असल्याचे चित्र आहे. परीक्षेचा काळ निश्चितपणे मतदाराचा आहे यावेळी मतदार विकास करणाऱ्या की जातीय स्वाभिमानावर. की, आर्थिक देवाण घेवाणीवर आपला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.