आश्वासनांची पुनरावृत्ती! रस्ते दुरुस्ती अर्धवट, शिरूर बांधकाम उपविभागाविरोधात नागरिकांचा संताप

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत शिरूर – मलठण महामार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होत असून प्रत्यक्ष कामे अर्धवट व शास्त्रीय पद्धतीने व दर्जेदार होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

खराब झालेल्या MPM रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, मागणीप्रमाणे कारपेटचे काम करण्यात येईल तसेच आनंद सोसायटी ते मोतीनाला या मार्गावर कारपेटचे काम करून दिले जाईल, अशी ग्वाही सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता वारंवार देत आहेत. मात्र ही आश्वासने बैठकीपुरती व कागदापुरतीच मर्यादित राहात असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कामाबाबत विचारणा केली असता “सोमवार/मंगळवार सुरू करू” अशी कारणे देत अर्धवट काम करून वेळकाढूपणा केला जातो. परिणामी नागरिकांना अपघाताचा धोका, वाहतुकीचा खोळंबा व वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने उपविभागातील अधिकारी बिनधास्त झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.खड्डे कसे भरायचे, गतिरोधक कसे करायचे, रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने कसे करायचे. या प्राथमिक बाबीही जर नागरिकांनी सांगाव्या लागत असतील तर ते प्रशासकीय अपयश असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

नागरिकांची मागणी आहे की, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्क्रिय व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच गरज असल्यास सक्तीचे प्रशिक्षण देऊन उपविभागात कार्यक्षम व जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. अन्यथा नाईलाजाने जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी दिला आहे.