शेतकऱ्यांबाबतच्या अवमानकारक वक्तव्यावरून शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना इशारा; कोकाटेंना शिरूरमध्ये फिरू देणार नाही 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरूणकुमार मोटे): “शेतकऱ्यांना कर्जमाफी साखरपुडा आणि लग्नासाठी हवी असते” असे विधान करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून, या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या कोकाटे यांना शिरूर तालुक्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तालुकाप्रमुख पोपट शेलार यांनी दिला. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी केले असून, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

दरम्यान, शेलार यांनी ‘साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजना’ रद्द करण्याची मागणीही केली आहे. घोड धरणातून अहमदनगर जिल्ह्यातील ३२ गावांना १.८ टीएमसी पाणी देण्याच्या या योजनेमुळे शिरूर तालुक्यातील शेती आणि रांजणगाव एमआयडीसीवर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

शिरसगाव काटा, निर्वी, चिंचणी, शिंदोडी, गुनाट, निमोणे, गोलेगाव, तर्डोबाची वाडी आदी गावांमध्ये आधीच पाणीटंचाई आहे. उन्हाळ्यात या भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे या योजनेमुळे स्थानिक शेतकरी अधिक अडचणीत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील भाष्य करणाऱ्या मंत्री कोकाटे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.