शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारकूड वस्ती ता. शिरूर येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचा अनुभव मिळावा या उद्देशाने ‘आठवडा बाजार व आनंद मेळावा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे धडे मिळावेत आणि शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, या हेतूने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्समध्ये परिसरात उपलब्ध होणारा ताजा भाजीपाला, फळे तसेच घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मेथी, कोथिंबीर, शेपू, आळू, कारले यांसारख्या देशी पालेभाज्यांसह इतर वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात काही विद्यार्थी विक्रेते बनून वस्तू विक्री करत होते, तर इतर विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ ग्राहक म्हणून वस्तू खरेदी करत होते. विद्यार्थ्यांनी एकमेकांकडूनही विविध वस्तू खरेदी करत या बाजाराचा आनंद लुटला. त्यामुळे त्यांना ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत, वस्तूंची मांडणी, पैशांचा व्यवहार आणि विक्रीचे तंत्र यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या उपक्रमाचे कौतुक करताना पंचायत समिती सदस्या मनीषाताई पाचंगे म्हणाल्या, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, धाडस, व्यवहारिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित होतो.”
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख गोडसे सर व रणदिवे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश कारकुड व सर्व सदस्य, माजी अध्यक्ष नीलेश डफळ, गायकवाड सर तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहकार्य केले.
यावेळी वाघाळे गावच्या सरपंच अनिता गावडे, पोलीस पाटील काजलताई कारकूड, माजी सरपंच नंदाताई शेळके, माजी सरपंच विकास कारकुड, संगीता थोरात, सामाजिक कार्यकर्ते शामराव शेळके, चेअरमन विश्वनाथ कारकुड, आजी-माजी चेअरमन, वनरक्षक हनुमंत कारकुड, मनिषाताई मांदळे, स्वातीताई थोरात, सचिन थोरात तसेच पुजारी अरुणराव कारकूड, दादा कारकूड इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.