shirkrapur-malthan-road

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
शिरूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते मलठण दरम्यान सुरू असलेल्या रस्ता नुतनीकरणाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने तसेच कामादरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात मातीचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान प्रचंड धूळ उडत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. धुळीमुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामासाठी मातीऐवजी मुरुमाचा वापर करून त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी मारण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देणे अपेक्षित आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिक्रापूर ते मलठण या रस्त्याच्या रुंदीकरणाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. पण, या मार्गाला कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याचे काम सुरू असल्याचा कोठेही फलक नाही. रस्त्यावर काम करणारे कामगार कोणतीही माहिती देत नाहीत. यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांना काम सुरू असलेल्या याच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जावे लागते. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूकही याच मार्गाने करावी लागत आहे. स्थानिकांना रोजच्या कामासाठी त्यांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र धूळ आणि खड्ड्यांमुळे प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. संबंधित ठेकेदाराकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

गणेगाव खालसा येथील पुलाच्या कडेला कोणतीही सुचना अथवा रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या नुतनीकरणाबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. पण, नागरिकांच्या तक्रारींकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच कामाची गती वाढवून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे आणि धूळ कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. याकडे प्रशासन आणि ठेकेदार गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रस्त्याच्या कडेच्या झाडांची कत्तल…
शिक्रापूर ते मलठण या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जुनी झाडे होती. पण, सध्या रस्त्याचे रुंदीकरणादरम्यान झाडांची कत्तल करण्यात आली आहेत. मोठ-मोठी डेरेदार झाडे कापल्यामुळे जुन्या पिढीतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
(क्रमशः)

शिरूर-पाबळ रस्त्यावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य…

मलठण-कवठे येमाई अष्टविनायक रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण; ऊस वाहतूक…

शिरूर! रस्त्यावरील वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच बिकट…

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिरूर -पाबळ रस्त्यावर धोकादायक खोदकाम; नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका