थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का

आरोग्य

सध्या सगळीकडेच वातावरण खूप थंड झाले आहे. काही ठिकाणी तर एवढी थंडी आहे की सगळे अंग गोठून गेल्यासारखे होते. अशा कडाक्याच्या थंडीत आपोआपच मग गरमागरम चहा, कॉफी घेण्याची इच्छा हाेते. त्यातही चहाप्रेमी असतील तर त्यांना भरपूर आलं किंवा दालचिनी, वेलची असं सगळं घालून केलेला वाफाळता, सुगंधी चहा घेण्याची इच्छा होते. चहा घेतला की अंगात उब येऊन थोडी तरतरी येते.. त्यामुळेच तर बऱ्याच लोकांचं चहा पिण्याचं प्रमाण हिवाळ्यात जवळपास दुपटीने वाढलेलं असतं. तुम्हीही थंडीमुळे असा दिवसभरातून वरचेवर चहा घेत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच..

थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलं आहे का

चहा पिण्याचं प्रमाण असं एकदम जास्त वाढलं असेल तर त्याचा निश्चितच तुमच्या आरोग्यावर, पचनसंस्थेवर परिणाम होतो. आपली पचनक्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर चहा घेत असाल तर खाण्यापिण्यातून जे काही पौष्टिक पदार्थ तुमच्या शरीरात आलेले आहेत ते पदार्थ आणि विशेषत: लोह शरीरात पुर्णपणे मिसळण्यात अडथळा येतो. त्यामुळे दुधाचा चहा घेण्याचं प्रमाण नियंत्रितच ठेवा. जर तुम्हाला चहा प्यावाच वाटत असेल तर मग पुढील पद्धतीने चहा करा आणि तो प्या.

चहा प्यायची इच्छा झाली तर कोरा चहा म्हणजेच दूध न टाकता केलेला चहा प्या. दुधाचा चहा दिवसातून एकदा किंवा दोनदा पिणं ठिक आहे. पण तुमचं चहा पिण्याचं प्रमाण त्याहूनही जास्त असेल तर चहामध्ये दूध टाकणं टाळा. त्याऐवजी तुळशीची पानं, आलं, ओवा, गवतीचहा असं टाकून केलेला कोरा चहा घ्या. लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी हा पर्यायही चांगला आहे.

(सोशल मीडियावरून साभार)