दररोज सकाळी आपण उठतो तेव्हा अंगात थोडा आळस असताेच. अंगातला हा आळस दूर तेव्हाच होतो जेव्हा आपण गरमागरम चहाचा पहिला घोट घेतो. दिवसाची सुरुवातच मुळी चहाच्या घोटाने होत असते. कोणी बिनासाखरेचा चहा घेतात, कोणी बिनदुधाचा चहा घेतात, कोणी मसाल्याचा चहा घेतात तर कोणी आलं घालून केलेला चहा पितात. पण काही अपवाद सोडले तर बहुतांश लोक सकाळी चहा घेतातच. पण चहा पिताना आपल्या पोटात फक्त चहाच जातो आहे ना की त्यासोबत असे काही घटकही आपल्या पोटात जात आहेत जे आपल्या जिवाला धोका निर्माण करू शकतात,
प्लास्टिक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण तरीही बहुतांश घरांमध्ये चहा गाळण्यासाठी प्लास्टिकची गाळणीच वापरली जाते. जेव्हा आपण गरमागरम चहा प्लास्टिकच्या गाळणीमध्ये ओततो तेव्हा उकळत्या चहाच्या उष्णतेमुळे गाळणीच्या प्लास्टिकचे काही सुक्ष्म कण नक्कीच वितळतात आणि ते आपल्या पोटात जात असतात. मग तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीची चहाची गाळणी वापरली तरी हे असं होतंच, त्यामुळे चहा गाळण्यासाठी प्लास्टिकच्या गाळणीचा वापर करणं कटाक्षाने टाळावं.
कारण हळूहळू सुक्ष्म कणांच्या रुपात आपल्या शरीरात जाणारं प्लास्टिक आपल्या रक्तामध्ये, आतड्यांमध्ये साचायला सुरुवात होते आणि त्यातूनच मग अनेक कठीण आजारांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे अगदी थोडक्या पैशांकडे बघू नका. स्टीलच्या गाळणीपेक्षा प्लास्टिकची गाळणी ५० ते ६० रुपयांनी नक्कीच स्वस्त आहे. पण त्या ५०- ६० रुपयांपेक्षा तुमचे शरीर जास्त अनमोल आहे. त्यामुळे आपल्या घरात तात्काळ हा बदल करा. काही लोकांचा ऑफिसमध्ये खूप जास्त चहा पिणं होतं. हा चहा नेमका कोणत्या गाळणीतून गाळला जात आहे, याकडेही लक्ष द्यायला हवं. शक्य असल्यास त्यातही बदल करायला हवा.
(सोशल मीडियावरून साभार)