दहीभात विशेषतः रात्रभर ठेवलेला, आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पण, जर रोज सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही वेळा फक्त आंबवलेला दहीभातच खाल्ला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
दररोज दहीभात खाल्ल्याचे फायदे
नियमित दहीभात खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण संतुलित राहते आणि पचनक्रिया सुधारते. दहीभात शरीराला थंडावा देतो, आम्लपित्त कमी करतो आणि त्यात कॅल्शियम, प्रथिनं आणि चांगले फॅट्स असतात.
गरम हवामानात राहणाऱ्यांनी आणि संवेदनशील पचन असणाऱ्यांना शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात रहावी व आतड्यांच्या आरोग्यासाठी हे अन्न उपयुक्त आहे.
रात्रभर ठेवलेला दहीभात खाणं सुरक्षित आहे का
रात्रभर ठेवलेला दहीभात खाणं सुरक्षित आहे का हे तो पूर्णपणे कशा पद्धतीने साठवला आहे त्यावर अवलंबून आहे.
“दहीभात जर रात्रभर बाहेर ठेवला गेला आणि रेफ्रिजरेट नसेल, तर तो जास्त आंबून त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढवू शकतात. पण, तो योग्य प्रकारे फ्रिजमध्ये ठेवला असेल तर त्यातील प्रोबायोटिक फायदे टिकून राहतात आणि तो सुरक्षित असतो.
तसेच भांड्यांची स्वच्छता राखणं आणि एकच पदार्थ पुन्हा पुन्हा गरम न करणंही आवश्यक आहे.
तीन महिन्यांसाठी रोज तीन वेळा फक्त दहीभात खाल्ल्यास काय होतं?
दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रत्येक जेवणात फक्त दहीभात खाल्ल्यास ते हलकं आणि आरामदायी वाटतं, पण तीन महिने सलग असं करणं शरीरासाठी योग्य नाही.
“आंबवलेल्या दहीभातात प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम असलं तरी वारंवार खाल्याने त्यातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात आणि उलट आम्लपित्त, गॅस, पोटफुगी किंवा पचनाशी संबंधित असंतुलन निर्माण होऊ शकतो.
तसेच सतत एकाच अन्नावर अवलंबून राहिल्याने पोषक तुटवडा निर्माण होतो.
शरीराला विविध प्रथिने, फायबर, जीवनसत्वं आणि हेल्दी फॅट्स आवश्यक असतात. फक्त दहीभात खाल्ल्यास शरीर सुस्त पडतं, त्वचा निस्तेज होते, केस गळतात आणि स्नायू कमकुवत होतात.
योग्य संतुलन कसं ठेवाव
दहीभात, भाज्या, डाळ किंवा प्रोटीनयुक्त पदार्थांसह घ्या.
त्यात काकडी, गाजर, डाळिंब, कांदा किंवा पुदिना घालून फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स वाढवा.
डाळ किंवा भाज्यांबरोबर घेतल्यास हा आहार अधिक संतुलित होतो. शक्यतो ताजा दहीभातच खा किंवा योग्यरीत्या फ्रिजमध्ये ठेवलेला दहीभातच खा.
दहीभात हा थंडावा देणारा, पचनास मदत करणारा आणि प्रोबायोटिक आहार आहे, पण — फक्त दहीभातावर तीन महिने अवलंबून राहणं शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. शरीराला विविधता हवी असते – भातासह डाळ, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश करा, जेणेकरून आरामासह पोषणही टिकेल.
(सोशल मीडियावरून साभार)