मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

महाराष्ट्र

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची चिमुरडी हरवल्याची घटना घडली. गर्दीत आई-वडिलांपासून ताटातूट झाल्याने ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती. डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर थरथर—स्वतःचे नाव सांगतानाही तिचा आवाज दाटून येत होता.

सकाळच्या सुमारास पाठीवर काळी बॅग असलेली, रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरताना ही मुलगी दिसली. अशा वेळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांनी तिला आधार देत शांत केले आणि प्रेमाने विचारपूस सुरू केली. मात्र, भीतीमुळे मुलीला शाळेचे नाव, पत्ता किंवा पालकांची माहिती सांगता येत नव्हती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे व मिसिंग स्टाफच्या मदतीने स्थानक परिसरात व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. रेल्वे व मेट्रो परिसरात सातत्याने उद्घोषणाही करण्यात आली.

दरम्यान, आझाद मैदान पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी मुलीच्या नातेवाईकांची माहिती पडताळून पाहिली. काही वेळातच मुलीचे वडील आणि काका तेथे पोहोचले. ओळख पटताच त्या चिमुरडीला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

हरवलेली मुलगी अनाबिया सुलतान मुस्ताक शेख (वय ८ वर्षे) आई-वडिलांच्या कुशीत परत येताच उपस्थितांचे डोळे पाणावले. काही काळासाठी भीतीदायक ठरलेला हा प्रसंग सुखरूप शेवटाकडे वळला.

मुंबई पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे संभाव्य अनर्थ टळला. या माणुसकीच्या कार्यासाठी संबंधित पोलिस अधिकारी व पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनीही महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांचे फोनवरून अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत