नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यापूर्वी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीनंतर महापौर पदाबाबत अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसावा यासाठी पक्षात हालचाली सुरू आहेत. मात्र काही घडामोडींमुळे निर्णय लांबणीवर पडला असून, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवण्यात आला आहे, असे वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवरही वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या संस्कृतीनुसार दशक्रिया झाल्यानंतरच घरातील सुरळीत कामकाज सुरू होते, मात्र राज्यातील राजकारण इतके सडले आहे की कोणतीही वाट न पाहता शपथविधी करण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊ नयेत यासाठीच हा कट रचण्यात आला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते का? असा टोला लगावत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा पक्षविलीनीकरणावर अधिक चर्चा झाली, यावरून काही लोकांना यात आनंद झाला असल्याचे दिसते. आपल्या मोठ्या नेत्याच्या निधनानंतर दोन-चार दिवसही थांबण्याची नैतिकता काही नेत्यांनी दाखवली नाही, असे सांगत महाराष्ट्रातील राजकारणातील नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार यांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एनडीएसोबत राहण्याची अपरिहार्यता असल्याचा दावाही त्यांनी केला. विविध आरोपांमुळे शांत झोप लागावी यासाठी भाजपला साथ देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच अजित पवार यांच्या मृत्यूबाबत उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली.