शैक्षणिक सहलीसाठी ‘एसटी’कडून ५० टक्के सवलत; तर शाळांसाठी हे आहे नियम व अटी? 

महाराष्ट्र

अहमदनगर: शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात व त्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात आली आहे. पण, सहलीसाठी विद्यार्थ्यांना सक्ती नको आणि सहलीसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची संमती बंधनकारक असेल, असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे.

सहलीचे आयोजन केल्यानंतर एसटी महामंडळाची बस भाड्याने घ्यावी. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची हेळसांड किंवा कुचंबना झाल्याची तक्रार पालकांनी केल्यास संबंधित शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याचेही प्रयोजन आहे. सहलीत मुलींचा सहभाग असल्यास त्याप्रमाणात शिक्षिका देखील असाव्यात, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, यातील बऱ्याच नियमांना फाटा देऊन सहलींचे आयोजन केले जाते ही वस्तुस्थिती आहे.

शैक्षणिक सहलीसाठी अटी व शर्ती…

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक.

समुद्र किनारी, उंच पर्वतावर, नदी, तलाव अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रतिबंध

सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात प्रशिक्षण देणे

सहलीपूर्वी पालकांची संमती व नियोजनाची माहिती पालकांना द्यावी

सहलीला फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचाच वापर करावा.

सहलीसाठी दहा विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा.

शैक्षणिक सहलीवेळी तंबाखू, गुटखा किंवा मादक पदार्थांचे सेवन नकोच.

सहलीतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांची; त्यासंबंधीचे स्टॅम्पवर हमीपत्र द्यावे.

रेल्वे क्रॉसिंगवरून बस ओलांडताना सावधगिरी बाळगावी, रात्रीचा प्रवास टाळावा.

सहलीतील विद्यार्थ्यांचा विमा काढणे, वैद्यकीय तपासणी, रक्तगट तपासणी करूनच घ्यावी.

एसटी महामंडळाकडून ५० टक्के सवलत

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. संबंधित शाळांनी त्यासाठी प्रत्येक डेपो किंवा आगारात जावून प्रस्ताव (विद्यार्थी यादी, शाळेच्या लेटरपॅडवर) सादर केल्यास त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिली जाते.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सहलीपूर्वी आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, यासंबंधीचे प्रशिक्षण द्यायलाच हवे, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. सहलीवेळी शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.