शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार…

महाराष्ट्र

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस खात्यांतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण शिवाजी कांचन यांनी बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रवीण कांचन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रवीण कांचन हे २०१४ साली महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या विमानगर पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार या पदावर कार्यरत आहेत.

यशासाठी कांचन यांना विमानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलिस निरीक्षक भरत जाधव व मुंबई येथील पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

दरम्यान, प्रवीण कांचन हे अवघ्या ५ वर्षाचे असतानाच, त्यांचे वडील शिवाजीराव कांचन यांचे निधन झाले होते. त्यानंतर प्रवीणची आई जनाबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. प्रवीण यांनी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ही जिद्दीने प्रयत्न करून यशाला गवसणी घातली. प्रवीण कांचन म्हणाले, ‘जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते. ध्येय नक्कीच गाठता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता त्याला प्रयत्नांच्या परिकाष्टाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते. आईमुळे यश मिळाले आहे.’