पुण्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश; नागरिकांना सहकार्याचे आवाहन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

मुंबई: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य मानून सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुनेत्रा पवार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पीएमआरडीए, जिल्हा परिषद तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ मदत, सुरक्षित स्थळी स्थलांतर, निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पूर, भूस्खलन आणि धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाबाबत वेळेवर एसएमएस, सोशल मीडिया आणि स्थानिक यंत्रणांमार्फत नागरिकांना सतर्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभागाने समन्वयाने बचावकार्य करावे, तसेच कोणताही अधिकारी मुख्यालय सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंद रस्ते, पूल आणि घाटांवर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू, जखमी आणि नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत देण्यासही सांगण्यात आले आहे.

वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच प्रत्येक दोन तासांनी परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देत आयटी पार्क आणि औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीकाठ आणि नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन करत भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी अतिदक्षतेचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत