पोलीस भरतीची मोठी अपडेट

महाराष्ट्र

औरंगाबाद: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत आम्ही १५ दिवसांनी वाढवून देत आहतो. उर्वरीत तक्रारी दूर करण्यासाठी हे जास्तीचे १५ दिवस देत आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नॉन क्रिमिलीयअरसाठी काय माहिती?

उमेदवारांना अर्ज भरताना नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मागील वर्षाचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र या वर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं हे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. पोलीस भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय होती अडचण?

राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन झाले आहेत. एक अर्ज सबमिट करण्यासाठी 4 ते 5 दिवस लागत आहेत. 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठीची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली. त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील.