मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांची रणधुमाळी ओसरताच भारतीय जनता पक्षने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. नव्या कार्यकारिणीत काही जुन्या चेहऱ्यांना नवी जबाबदारी देत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गेल्या आठ वर्षांपासून पक्षाची भूमिका आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने मांडणारे केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
“कार्यकर्ता पोस्टकार्डसारखा असतो” – उपाध्ये यांची प्रतिक्रिया
नव्या जबाबदारीनंतर केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उदाहरणाचा उल्लेख केला.“संघ परिवारात कार्यकर्ता हा पोस्टकार्डसारखा असतो. जो पत्ता लिहाल, तिथे ते पोहोचते. २६ वर्षे पक्षाचे काम केले. दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी दिल्याबद्दल नेतृत्वाचा आभारी आहे,” असे त्यांनी म्हटले.
सुषमा अंधारे यांचा टोला
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नव्या कार्यकारिणीवर टीका केली आहे.“संघर्षकाळात खस्ता खाल्लेल्यांना आता सतरंजीच्या कोपऱ्यावर बसवण्याची वेळ आली आहे. ही फडणवीसांची भाजपा आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
जुन्या-नव्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न
भाजपने नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष व सरचिटणीस पदांवर अनुभवी नेत्यांना संधी देत सोशल मीडिया आणि संवाद विभागात तरुणांना प्राधान्य दिले आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान देत प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.या बदलांमुळे भाजपच्या संघटनात्मक रणनीतीत पुढील काळात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.