मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आघाड्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादीची कोअर कमिटी सक्रिय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.
भाजपमध्ये तिकीटासाठी चुरस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आहे. सातपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता असून त्यातील एक जागा पुन्हा रामदास आठवले यांना देण्यात येऊ शकते.उर्वरित तीन जागांसाठी मात्र मोठी रस्सीखेच सुरू आहे. ज्येष्ठ नेते विनोद तावडे, विजया राहटकर आणि धैर्यशील पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
२ एप्रिलला सात सदस्यांची मुदत संपणार
महाराष्ट्रातील डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.
निवडणुकीची अधिसूचना २६ फेब्रुवारीला जाहीर होणार असून ५ मार्च ही उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत आहे. ६ मार्च रोजी छाननी, तर ९ मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्हे असून, अंतिम उमेदवारी आणि निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.