मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर येत असेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.”
सपकाळ यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारच्या काळात सचिवालयाचे नाव बदलून ‘मंत्रालय’ ठेवण्यात आले होते, जेणेकरून लोकांना सरकार आपले वाटावे. मात्र, सध्याच्या महायुती सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘भ्रष्टाचारालय’ झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
लाच घेताना पकडलेल्या लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच रक्कम स्वीकारल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्री झिरवळ यांनी “या प्रकरणात संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका जाहीर केली आहे. मात्र, निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने कायम ठेवली आहे.या प्रकरणामुळे भाजपा महायुती सरकार अडचणीत आले असून पुढील काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.