मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्र

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडल्याचा दावा केला जात असला, तरी गेल्या १२ वर्षांत देशासाठी त्यांच्या सरकारने नेमके काय योगदान दिले, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. “मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही आणि दाखवण्यासारखे ‘काम’ही नाही,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यापासून ते दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, स्मार्ट सिटी उभारणे, दहशतवादाचा बिमोड करणे अशा अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, उद्योग आणि कृषी क्षेत्रात अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे सांगत त्यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या योजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोदी सरकार मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सपकाळ यांनी यावेळी भारताच्या विकासात काँग्रेसच्या विविध पंतप्रधानांचे योगदान अधोरेखित केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात मोठी धरणे, वैज्ञानिक संस्था, आयआयटी आणि आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्था उभारून आधुनिक भारताचा पाया रचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली संगणक क्रांती झाली, तर माहिती अधिकार कायदा, मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा आणि शिक्षण हक्क कायद्यासारख्या महत्त्वाच्या योजना काँग्रेस सरकारने देशाला दिल्याचे त्यांनी नमूद केले.

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरूनही सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भातील त्यांच्या विधानामुळे देशाच्या एकात्मतेचा, भारतीय लष्कराचा आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बलिदानाचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला.

महाजन यांचे वक्तव्य खलिस्तान समर्थक आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारे असल्याचा आरोप करत, त्यांची मंत्रिमंडळातून तसेच भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. अशा वक्तव्यांचे समर्थन होणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत