नागपूर: चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने तयारी केली असून उद्या काँग्रेसचा महापौर होणार असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले १० नगरसेवक, तसेच इतर मित्रपक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केला.
चंद्रपुरात काँग्रेसकडे सध्या २७ नगरसेवकांचे संख्याबळ असून, जनसुराज्य पक्षाचे ३ नगरसेवक आधीच सोबत आहेत. एमआयएम आणि बसपाने जनसुराज्य पक्षाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकूण आकडा ३० च्या पार गेला आहे. फक्त दोन नगरसेवकांच्या पाठिब्यांची आवश्यकता काँग्रेसला आहे.
यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वातील १० नगरसेवकांचा गट आणि २ अपक्ष नगरसेवकांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यास प्राधान्य दिले असल्याने पद वाटपाबाबत मध्यम मार्ग काढण्यात येईल,अस वडेट्टीवार म्हणाले.काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौर पद काँग्रेसकडेच राहील. इतर पदांबाबत मित्रपक्षांना सन्मानजनक ऑफर देण्यात आली असून, त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सकारात्मक आहे. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, अस वडेट्टीवार म्हणाले.
आज १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागला. या निकालात महायुतीला मिळालेला विजय हा सत्याचा नसून केवळ सत्तेचा आहे. हा धनशक्तीचा विजय आहे, असा टोला काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी लगावला. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला चांगली मतं मिळाली,यातूनच पुरोगामी विचारांची मते विभागण्यात भाजप यशस्वी ठरली. मात्र, हे यश सत्तेचा गैरवापर करून मिळवलेले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
संसदेचे अधिवेशन सुरू असून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीने अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना बोलू देत नाहीत, वारंवार माईक बंद केला जातो, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. चीन आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेत्यांना बोलू न देणे म्हणजे अध्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत का असा सवाल उपस्थित करतो, अस वडेट्टीवार म्हणाले.