मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या (राजशिष्टाचार) वतीने देण्यात आली आहे.
दुखवट्याच्या कालावधीत राज्यातील ज्या सर्व शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.