डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी

महाराष्ट्र

मुंबई: भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अभूतपूर्व यश मिळवत, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. राज गजभीये यांनी देशात पहिल्यांदाच “टेलीसर्जरी” करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही शस्त्रक्रिया गुरुग्रामहून सुमारे १००० किलोमीटर दूर असलेल्या नागपूरमधील GMCH मध्ये त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

ही अद्वितीय शस्त्रक्रिया भारतात बनवलेल्या ‘SSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम’ च्या माध्यमातून करण्यात आली. या प्रक्रियेत एका रुग्णावर अंबोट म्हणजे हर्नियाची शस्त्रक्रिया, आणि दुसऱ्यावर पित्ताशय काढण्याची ऑपरेशन करण्यात आली. आश्चर्य म्हणजे सर्व शस्त्रक्रियेचे नियंत्रण डॉ. गजभीये गुरुग्राममध्ये रोबोटिक कन्सोलवर बसून करत होते तर GMCH नागपूरमध्ये एक सहायक टीम रोबोटिक हाताच्या सहाय्याने प्रत्यक्ष कार्य करत होती.

या टेलीसर्जरी दरम्यान कोणत्याही प्रकारचा विलंब न होता डॉ. गजभीये यांचे प्रत्येक हालचाल रोबोटिक यंत्रणेमार्फत नागपूरच्या रुग्णांवर अचूकपणे पोहोचत होत्या. या यशस्वी प्रयोगामुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा मार्ग खुला झाला आहे. दूरवरच्या गावांमध्ये असलेल्या रुग्णांना आता शहरातील तज्ज्ञ शल्यचिकित्सकांकडून शस्त्रक्रिया मिळू शकणार आहे, तेही डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही.

भारतात विकसित SSI मंत्रा प्रणाली

ही शस्त्रक्रिया ज्या ‘SSI मंत्रा’ रोबोटिक प्रणालीने पार पडली, ती संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेली आहे. SS Innovations International या कंपनीचे संस्थापक डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले, “हे फक्त शस्त्रक्रियेचे यश नसून, आरोग्यसेवेत क्रांती घडवणारे पाऊल आहे. आता तज्ज्ञ सेवा कोणत्याही भौगोलिक अडथळ्यांशिवाय भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचू शकते.”

डॉ. गजभीये यांचा संदेश

या यशानंतर डॉ. गजभीये यांनी सांगितले, “ही फक्त एक शस्त्रक्रिया नव्हे, तर सरकारी वैद्यकीय संस्थांसाठी एक दिशा आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाची पद्धत बदलू शकते आणि ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी नवीन दारे उघडू शकतात. GMCH नागपूरला ही क्रांती सुरू करण्याचा अभिमान आहे.”

ही शस्त्रक्रिया कशी पार पडली?

डॉ. गजभीये गुरुग्राम येथील रोबोटिक कन्सोलवरून शस्त्रक्रिया करत होते

नागपूरमधील GMCH मध्ये दोन रुग्णांवर (हर्निया आणि पित्ताशय) रोबोटिक प्रणालीच्या मदतीने ऑपरेशन झाले

संपूर्ण प्रक्रिया जवळपास शून्य विलंबात आणि अत्यंत अचूकतेने पार पडली

नागपूरमध्ये उपस्थित असलेली टीम रोबोटला सहाय्य करत होती

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा

रुग्णांना आता शस्त्रक्रियेसाठी शहरात यावे लागणार नाही

या ऐतिहासिक यशामुळे भारताच्या सार्वजनिक आरोग्यसेवेला नवसंजीवनी मिळाली असून यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्येही तज्ज्ञ उपचार उपलब्ध होऊ शकतात. ही केवळ वैद्यकीय नवकल्पना नव्हे, तर आरोग्यसेवेतील सामाजिक समता प्रस्थापित करणारे पाऊल ठरू शकते.