राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही; मुकुल वासनिक

महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू; नाना पटोले

मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार झाली पण या राज्यघटनेचे बीज स्वातंत्र्यापूर्वीच कराची अधिवेशनात पेरले गेले होते. स्वातत्र्यानंतर देश कसा असेल, कोणासाठी स्वांतत्र्य हवे, याचा विचार झाला तेव्हा सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा देश उभा करण्याचा विचार झाला आणि त्यातच राज्यघटनेचे बीज रोवले गेले. मागील काही वर्षात केंद्रातील सरकारने मात्र राज्यघटनेला तिलांजली देण्याचे काम केले आहे. आता राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी स्पष्ट केले आहे.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या कार्यकारिणी बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, अनिस अहमद, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, उपाध्यक्ष संजय राठोड, भा. ई. नगराळे, प्रा. प्रकाश सोनावणे, अश्वीनी खोब्रागडे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुकुल वासनिक पुढे म्हणाले की, देशासमोर आज सर्वात मोठे आव्हान केंद्रातील भाजपा सरकार आहे. हे सरकार संसदेचे कामकाजही चालू देत नाही, संसद सुरु होताच बंद होते. संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते पण भाजपा सरकारला संसद चालूच द्यायची नाही. केंद्रातील भाजपा सरकार ओबीसी, एससी, एसटी या मागास घटकांच्या कल्याण निधीत सातत्याने कपात करत आहे. मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना राबवल्या जात नाहीत. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मागासवर्गीयांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु केले जाईल. मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये तरतूद केली जाईल.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ नंतर देशात व राज्यात हिंदुत्ववादी व्यवस्थेने डोके वर काढले आहे. शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या भूमीत समाजात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम सुरु आहे पण जनतेने भाजपाच्या या षडयंत्रला बळी पडू नये. काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन संघर्ष करत आहे. खोटी आश्वासने देऊन मोदी सत्तेत आले पण जनतेला आता ही चूक लक्षात आली असून २०२४ च्या निवडणुकीत जनता पुन्हा चूक करणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू. राज्यघटनेने आपल्याला आरक्षण दिले आहे पण आरक्षणाचे हे कवच भाजपा सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने काढून घेतले आहे.

सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकल्या असल्याने तिथे नोकरीतील आरक्षण गेले आहे, सरकारी नोकर भरतीही केली जात नाही. यावर मात करायची असेल तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तरच डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा समाज घडेल.

यावेळी बोलाताना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सध्या आपल्यासमोरची लढाई मोठी आहे, सत्तेतील भाजपा सरकार डॉ. बाबासाहेबांचे विचार संपवायला निघाले आहे. मागास वर्गींयांचे प्रश्न प्रलंबित आहेत, मागास वर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, घरांचे प्रश्न यावर सरकार निर्णय घेत नाही, केवळ आश्वासन देत आहे. राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले होत आहेत पण सरकार काही करत नाही. ही लढाई मोठी असून सर्व समाज घटकाने ताकदीने यात सहभागी झाले पाहिजे. आगामी काळात मोठी चळवळ उभी करा, जागरुक रहा आणि समाजात काही लोक भांडणे लावत आहेत त्यापासून सावध रहा.

दिक्षाभूमी ते चैत्यभूमी संविधान गौरव यात्रा…

राज्यातील एसीसी विभाग हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आगामी निवडणुकीत जोमाने काम करू आणि काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करून सोनियाजी गांधी, राहुलजी व मल्लीकार्जून खर्गे यांचे हात बळकट करु. सध्या देशात व महाराष्ट्रात मनुवादी विचाराचे सरकार असून संविधान धोक्यात आले आहे. संविधान बचाव, देश बचाव हा संदेश घेऊन लवकरच दिक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी संविधान गौरव यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेदम्यान प्रत्येक जिल्ह्यात संविधानाच्या दोन हजार प्रतींचे वाटप केले जाणार आहे, असे एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सांगितले.

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांचे मौन चिंताजनक…

मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे, ४५ दिवस झाले मणिपूर धगधगत आहे, तिथली परिस्थिती अतिशय भयावह आहे. कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. सुरुवातीचे २५ दिवस केंद्र सरकारचा प्रतिनिधी मणिपूरकडे फिरकलाच नाही. २५ दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी भेट देऊन १५ दिवसांची मुदत मागितली पण मणिपूरच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. डबल इंजिनचे सरकार मणिपूरमध्ये अपयशी झाले आहे. पोलीस स्टेशनवर हल्ले करून शस्त्रास्त्र पळवली जात आहे. मणिपरमध्ये अराजक परिस्थिती आहे पण देशाचे पंतप्रधान मणिपूरमध्ये शांतता रहावी म्हणून एक शब्दही बोलत नाहीत हे अत्यंत चिंताजनक आहे, असे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना बियाणे, खते, पेरणीसाठी पैसे द्या…

राज्यातील शेतकरी संकटामागून संकटाचा सामना करत आहे. अवकाळी पाऊस व गरपीटीनंतर जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही. अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. आता पेरणीचा हंगाम सुरु झाला आहे पण शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत राज्य सरकारने शेतकऱ्याला बियाणे, खते मोफत द्यावीत व पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, प्रभू श्रीरामावर काँग्रेसची आस्था आहे, अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात आधी प्रयत्न केले. भाजपाला मात्र श्रीराम फक्त मते मागण्यासाठी हवे आहेत. कर्नाटकात त्यांनी मतांसाठी हनुमानाच्या नावाचा वापर करून पाहिला पण बजरंग बलींनी साथ दिली नाही. आताही भाजपा श्रीराम व बजरंग बलीचा वापर मतासाठी करत आहे पण श्रीराम व बजरंगबली खोटारड्या भाजपाला साथ देणार नाही.

हिंमत असेल तर बीएमसीतील २५ वर्षांच्या कामाची एसआयटी चौकशी करा…

मुंबई महानगरपालिकेतील २०१९ ते २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु भाजपा शिवसेनेबरोबर २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होता. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत असेल तर या २५ वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. भारतीय जनता पक्ष व शिंदे सरकार हे आता विरोधकांना धमकावण्याची भाषा करत आहेत. परवाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांची तशीच भाषा होती पण त्याला आम्ही भिक घालत नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.