विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा; नाना पटोले

महाराष्ट्र

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच तात्काळ त्याची अंमलबजावणी व्हावी,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली.

विधीमंडळ कामकाजासाठी विधिमंडळ कमिट्या या आत्मा असतात, कामकाजासाठी या कमिटीच्यांचे महत्व आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता वारंवार या कमिट्यासाठींची नावे बदलत आहेत परंतु पावसाळी अधिवेशन संपताच या कमिट्या स्थापन केल्या जातील, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.