मुंबई: जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आपत्कालीन आरोग्य व्यवस्था उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी भविष्यात अशा घटना घडल्यास तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली.
तांबे म्हणाले की, शिर्डी, पंढरपूर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर आदी तीर्थक्षेत्रांकडे दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक पायी तसेच वाहनांद्वारे प्रवास करतात. अशा वेळी अपघात किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्य करण्यापेक्षा आधीपासूनच सक्षम आरोग्य सुविधा उभारणे अधिक महत्त्वाचे आहे.
आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील सिन्नर-वावी परिसरात अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. वावी ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न त्यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला असून मंजुरी मिळूनही काम सुरू झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कुंभमेळ्यापूर्वी वावी ट्रॉमा केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याबरोबरच तात्पुरत्या ट्रॉमा सुविधा, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
“संकट आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा ते येण्यापूर्वीच यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे. वेळेत उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.