नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. कुटुंबाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ न करता शांततेत संवाद साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष तपास समिती स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाशी संवाद साधून सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. “न्याय मिळवून देणे आणि कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी आहे,” असे गोऱ्हे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर पीडितेची ओळख उघड करणारे संदेश प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा असून नागरिकांनी असे संदेश तात्काळ हटवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या घटनेचा जात-धर्माच्या आधारावर गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी तीव्र टीका केली.

महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी राज्यात फास्टट्रॅक न्यायालयांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अपेक्षित १३८ न्यायालयांपैकी केवळ सुमारे ४० कार्यरत असल्याचे सांगत उर्वरित न्यायालये तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नसरापूर प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून येत्या अधिवेशनातही हा मुद्दा ठामपणे मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत