चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

महाराष्ट्र

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले.

अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. मृत विवाहितेचे नाव छाया असे आहे. छायाचा २००९ मध्ये अमोल देशमुखसोबत विवाह झाला होता. सुरुवातीला दोन वर्षे छायाला चांगले वागवण्यात आले; मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

१५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी छायाची हत्या करण्याच्या उद्देशाने आधी तिची बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून रॉकेल टाकून आग लावली. छाया स्वतःला वाचविण्यासाठी प्रतिकार करत होती. या झटापटीत आरोपींचे कपडेही रॉकेलने ओले झाल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात सत्र न्यायालयाने २ मार्च २०२१ रोजी दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने प्रकरणातील पुरावे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचे अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.