पंतप्रधानांच्या वेळेअभावी लांबली राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांची ‘नमो शेतकरी महासन्मान योजना

महाराष्ट्र

संभाजीनगर: राज्यातील ७२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता जूनअखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे.

कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठविली, त्यासाठी एक हजार ४४५ कोटींची तरतूद देखील केली, मात्र पंतप्रधानांची वेळ अजून निश्चित झाली नसल्याने पहिला हप्ता लांबणीवर पडला आहे. योजनेच्या निमित्ताने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी गिफ्ट दिली आहे. पण, योजनेचा पहिला हप्ताा कधी मिळणार, कधीपासून योजनेला प्रारंभ होणार याचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही.

केंद्र सरकारकडून शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्याला शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता मिळतो. आता राज्य सरकार देखील प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये देणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचेच निकष राज्याच्या योजनेला लागू असणार आहेत. दरम्यान, राज्यातील ७२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, एकत्रित मालमत्ता नोंद अशी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांना पुढील काही दिवसांत राज्य सरकारचा पहिला हप्ता मिळणार आहे. कृषी विभागाच्या वतीने अजूनही राहिलेल्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

…तर ‘त्या’ शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी

राज्यातील जवळपास २६ लाख शेतकऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्या शेतकऱ्यांना आता शेवटची संधी दिली जाणार आहे. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या नावांची यादी गावोगावी वाचली जाईल. पंचनामा करून त्या शेतकऱ्यांची नावे यादीतून कायमची डिलीट केली जाणार आहेत. त्यामुळे केंद्र व राज्याच्या योजनांसाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण व मालमत्तांची एकत्रित नोंद केलेली नाही, त्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

जून अखेरीस मिळणार पहिला हप्ता

राज्य सरकारचा एप्रिल ते जुलै या चार महिन्यातील पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे योजनेच्या लोकापर्णासाठी वेळ मागितली आहे. त्यांची वेळ पुढच्या आठवड्यात मिळेल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जूनअखेरीस राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता ७२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.