मुंबई: नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली.
बैठकीला आमदार माणिकराव कोकाटे, शिवाजी आढळराव पाटील, शरद सोनवणे, विठ्ठल लंघे, सत्यजीत तांबे, अमोल खताळ, बाबाजी काळे, प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे संयुक्त शिष्टमंडळ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे सकारात्मक निर्णयासाठी प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तीनही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकत्रितपणे प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.
बैठकीत राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाबाबतही सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित अडचणी मुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारपर्यंत पोहोचवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. जीएमआरटीशी संबंधित तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक प्रभावी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.