प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन अनिवार्य

महाराष्ट्र

१०० टक्के विद्यार्थी उपस्थितीचे उद्दिष्ट; सुट्टी देऊ नये; शिक्षण आयुक्तांचे आदेश

मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घ्यावी, तसेच प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राज्यातील एक लाखाहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवला जाणार असून, त्यामध्ये सुमारे दोन कोटी १० लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सिंह यांनी ही माहिती दिली.

प्रजासत्ताकदिनी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर सुमारे २० मिनिटांचा सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी यापूर्वी ‘आनंददायी शनिवारी’ विद्यार्थ्यांचा सराव करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कवायतीसाठी एनसीसी व स्काउटच्या विद्यार्थ्यांची मदत घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्य जागृती व व्यायामाची आवड निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सिंह यांनी सांगितले. एकाच परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रितपणे संचलन कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

क्रीडा शिक्षकांची भरती होणार

दरम्यान, शाळांमधील पीटी तास गांभीर्याने घेतले जात नसल्याबाबत चिंता व्यक्त करत शिक्षण आयुक्तांनी क्रीडा शिक्षक भरतीचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. राज्यातील ४,८६० केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षक पदांची निर्मिती करण्यात आली असून, या पदांवर लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, सहसंचालक हारून अत्तार आणि संचालक डॉ. महेश पालकर उपस्थित होते.