महाड: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे मंत्री व शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात सरेंडर केले आहे. नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होता.
नेमकं प्रकरण काय?
मागील महिन्यात २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. महाड शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदान सुरू असतानाच मोठा गोंधळ उडाला. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याच वेळी रिव्हॉल्व्हर रोखल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
गंभीर गुन्हा दाखल, मात्र आरोपी फरार
या घटनेनंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्याविरोधात कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांनी पोलिसांसमोर हजर होणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिले.यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
हायकोर्टाची कडक टिप्पणी
या प्रकरणात गुरुवारी हायकोर्टाने प्रशासनाला जोरदार झापले.“एका मंत्र्याच्या मुलाला अटक करता येत नसेल, तर सरकार किती हातबल आहे?”अशी कडक टिप्पणी करत न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अखेर पोलिसांसमोर हजर
हायकोर्टाच्या या फटकार्यानंतर शुक्रवारी सकाळी विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विकास गोगावलेंचा दावा
या प्रकरणात आपली बाजू मांडताना विकास गोगावले यांनी असा दावा केला आहे की,“सुशील झांबरे यांनीच माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती.”मात्र, महायुतीतील दोन मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकल्याने महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
आता विकास गोगावले यांच्यावर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई कशी होते, तसेच अटक की जामीन याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.