सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात. मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांचा उत्तर द्यायला सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह तहकुब करण्याची वेळ येते ही गंभीर बाब आहे, हे वारंवार घडत आहे, या प्रकरणी संबंधितांना कडक शब्दात समज देण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारने याची गंभीर दखल घेण्याची सूचना सरकारला दिली.

राज्यातील सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच आपल्या मतदार संघातील प्रश्न विविध संसदीय आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच सरकारकडून याबाबत उत्तर देण्यासाठी विधानसभेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र सरकारमधील मंत्री याबाबत गंभीर नसतात. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात. मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह तहकुब करण्याची नामुष्की अनेक वेळा येते. सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दात समज देण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.