मुंबई: दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेश प्रक्रियेला २० मे २०२६ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाला कालबद्ध नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, तंत्र शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या करिअर घडविणारी महत्त्वाची शाखा असून या माध्यमातून तंत्रज्ञ, अभियंता तसेच उद्योजक होण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. दहावीनंतरचा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहेत. काही विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून प्रतिमहिना १ लाख रुपयांपर्यंतच्या नोकऱ्याही मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने NEP 2020 अनुरूप अद्ययावत ‘K Scheme’ अभ्यासक्रम लागू केला असून त्यातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये Outcome-based Credit System, इंग्रजी-मराठी द्विभाषिक शिक्षण व परीक्षा, Soft Skills, Entrepreneurship, Indian Knowledge System, Environment & Sustainability यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच IoT, Robotics, Drone Technology, Python Programming, 5G, Cloud Computing, Data Analytics, EV Technology, Machine Learning, AI, Green Building, UI/UX Designing यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाधारित विषयांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी ६ आठवड्यांवरून १२ आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राज्यात ९ Centres of Excellence, ४१ Multipurpose Computer Centres आणि ५ E-Yantra Labs स्थापन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
तंत्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या विविध उपक्रमांमुळे पदविका अभ्यासक्रमांतील प्रवेशित विद्यार्थ्यांची टक्केवारी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ८० टक्क्यांवरून २०२५-२६ मध्ये ९५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, आवश्यक माहिती, नावनोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ� येथे भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.