बदलापूर हादरला! शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कडक नियमावली जाहीर

महाराष्ट्र

बदलापूर: बदलापूर येथे शालेय मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि पालकांसाठी नवीन सुरक्षा नियमावली जाहीर करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच एका १२ वर्षीय शालेय मुलीचा स्कूल बस चालकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यापूर्वीही २०२४ मध्ये नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना देशभर गाजली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १२० शाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेत स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.

काय आहेत नवे सुरक्षा नियम?

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या प्रत्येक वाहनात जीपीएस आणि सीसीटीव्ही अनिवार्य

शालेय वाहनात पुरुष चालकासोबत महिला मदतनीस असणे बंधनकारक

चालक आणि वाहनमालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासणे आवश्यक

सर्व वाहनांची माहिती आरटीओमध्ये नोंदणीकृत असावी

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळल्यास कठोर कारवाई

दरमहा पालक समिती बैठक घेणे अनिवार्य

पालकांचीही जबाबदारी वाढली

पोलिसांनी पालकांना मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून मुलांच्या लोकेशनची माहिती ठेवावी, बस स्टॉप परिसरात सीसीटीव्ही असल्याची खातरजमा करावी आणि चालक-मदतनीसांची पार्श्वभूमी तपासावी, असे सांगण्यात आले आहे.

शाळांसाठी स्पष्ट इशारा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शाळांनी केवळ नियम कागदावर न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुलांचे बालपण सुरक्षित आणि आनंददायी राहावे यासाठी प्रशासन, शाळा आणि पालक यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.