मुंबई: शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहीर केले. पण त्यानंतर चार तासांतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर सडकून टीका करत हल्लाबोल चढवला आहे. ही युती म्हणजे आंबेडकरविरोधी असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने याबाबतचे एक निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रिपब्लिकन सेनेची भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती म्हणजे म्हणजे केवळ भाजपविरोधात आणि संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या चळवळीविरोधातच नव्हे तर फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारधारेविरोधातही आहे.
वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकरावर हल्ला चढविताना त्यांचा पपेट असा उल्लेख केला आहे. आम्ही आधी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला निवडणुकांमधील मदत केली होती. त्यांच्या विनंतीवरून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना वंचितच्या एबी फॉर्ममध्ये सामावून घेतले होत. अमरावती लोकसभेत आनंदराज यांना पाठिंबा दिला होता. पण आता हे सौजन्य समाप्त झाले आहे. वंचित काही मुद्द्यांवर मतांमधील भेद स्वीकारू शकते, पण बाबासाहेबविरोधी आणि आरएसएस-भाजपचे पपेट म्हणून काम करणाऱ्यांना नाही, अशी टीका कऱण्यात आली आहे.
वंचितने शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच्या लोकांना आवाहनही केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आता आरएसएस-भाजपचे पपेट असलेले, संविधानाऐवजी मनुस्मृतीला मानणाऱ्यांसोबत उभे राहायचे की संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या विचारधारेसोबत याचा निर्णय आता शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेतील लोकांनी घ्यायचा असल्याचे वंचितने म्हटले आहे. एकप्रकारे वंचितने आंबेडकरी जनतेला आंबेडकर-शिंदे युतीसोबत न जाण्याचेच आवाहन केले आहे.
आनंदराज आंबेडकर यांच्या निर्णयामुळे आम्ही खूप निराश झाल्याचेही वंचितच्या निवेदनात म्हटले आहे. या केवळ आमच्या भावना नाहीत, असे आम्ही मानतो. याद्वारे आम्ही रिपब्लिकन सेनेतील नाराज सदस्यांना वंचित बहुजन आघाडीत येण्यासाठी आमंत्रित करत असल्याचे निवदेनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी एकप्रकारे आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढविले आहे. रिपब्लिकन सेनेला भगदाड पाडण्याचेच त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून आंबेडकरी मते आपल्यासोबत आणण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या मनुसब्यांनाही धक्का बसला आहे.