मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असून, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
सपकाळ म्हणाले की, नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्यासह संपूर्ण रॅकेटमधील संबंधितांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी. या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा काँग्रेसच्या आंदोलनाचा विजय असला तरी त्यावर समाधान मानण्याचे कारण नसल्याचे सांगत सपकाळ यांनी आरोप केला की, त्यांच्या कार्यकाळात ‘वन नेशन, वन एक्झामिनेशन’च्या नावाखाली परीक्षा व्यवस्थेत गंभीर अनियमितता झाली. पेपरफुटीच्या घटनांमधून काही विशिष्ट वर्गाला आणि भाजपाशी संबंधित लोकांना फायदा करून देण्यात आला तसेच भ्रष्ट मार्गाने आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
नीट परीक्षेसाठी पालकांना करावा लागणारा खर्च केंद्र सरकारच्या अनेक विभागांच्या खर्चापेक्षाही अधिक असल्याचा दावा करत, या रॅकेटची पाळेमुळे खोलवर गेलेली असून संपूर्ण चौकशी होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे सपकाळ म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही काँग्रेसचे आंदोलन आणि कँडल मार्च सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.