मुंबई: महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याच्या कारकिर्दीमधील एका घटनेबद्दल पहिल्यांदाच सांगितलं आहे. ज्यामध्ये त्यानं सचिनचा सल्ला ऐकला होता. त्याचा मला आजही पश्चाताप होतो, असं द्रविडनं सांगितलं. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दोघंही टीम इंडियाचे महान क्रिकेटपटू आहेत. त्यांनी जवळपास दीड दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकत्र खेळलं. भारताकडून खेळताना अनेक विक्रम रचले. तसंच टीमला संस्मरणीय विजय मिळवून दिसले. त्यांची परस्परांमधील केमिस्ट्री जबरदस्त होती. ते अनेकदा एकत्र बॅटिंग करताना एकमेकांचा सल्ला घेत असत.
द्रविडला कशाचा पश्चाताप?
राहुल द्रविडनं आर. अश्विनच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या घटनेबाबत पहिल्यांदाच सांगितलं. द्रविड म्हणाला की, 2011 च्या इंग्लंड दौऱ्यात एकदा आऊट झाल्यानंतर त्याने DRS (निर्णय पुनरावलोकन प्रणाली) न वापरल्याचा त्याला पश्चात्ताप आहे. त्यावेळी सचिन तेंडुलकरनेही द्रविडला DRS न वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर द्रविड सचिनचा सल्ला ऐकून पॅव्हिलियनमध्ये परतल. त्यानंतर रिप्लेमध्ये द्रविड नॉट आऊट असल्याचं दिसलं.
द्रविड म्हणाला की, 2011 च्या इंग्लंड दौऱ्यातील एजबस्टन टेस्टमधील ही घटना आहे. “मी जिमी अँडरसनच्या चेंडूवर ड्राईव्ह मारला, तेव्हा मला ‘टुक’ असा आवाज ऐकू आला, पण बॅटवर काहीच जाणवले नाही. कधीकधी बॅटरला कळते. मोठा आवाज झाला, पण बॅटवर काहीच लागले नाही.”
ऑस्ट्रेलियन अंपायर सायमन टॉफेलने द्रविडला विकेट किपरकरवी कॅच आऊट असल्याचा निर्णय दिला. त्यावेळी दुसऱ्या टोकाला असलेल्या सचिनसोबत बोलल्यानंतर, त्याने तो निर्णय आव्हान न देण्याचा निर्णय घेतला. टॉफेल हे पाच वेळा ‘ICC पंच ऑफ द इयर’ विजेते अंपायर आहेत.
तो निर्णय चुकीचा होता
“आवाज झाला, आणि सायमन टॉफेल एकयचा, तेव्हा त्याला फारसे आव्हान दिले जात नव्हते. त्यांनी मला आऊट दिले, आणि मी सचिनकडे जाऊन सांगितले की मला काहीच जाणवले नाही,” असे द्रविडने सांगितले.
“सचिन म्हणाला, ‘मोठा आवाज झाला यार राहुल, मला खात्री आहे की तू बॅटनं बॉल मारला आहेस.’ आणि मला वाटले की कदाचित हो, कारण मलाही तो आवाज ऐकू आला होता,” द्रविड म्हणाला.
ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर आणि रिप्ले पाहिल्यावर, द्रविडला कळले की चेंडू बॅटपासून पूर्णपणे लांब होता. तो आवाज प्रत्यक्षात त्याच्या शूजच्या लेसवर बॅट लागल्यामुळे झाला होता.
2011 मधील तो इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी निराशाजनक होता. त्या दौऱ्यात भारतीय टीमचा सर्व चार टेस्टमध्ये पराभव झाला. पण, द्रविडनं संपूर्ण सीरिजमध्ये झुंजार खेळ केला. तो त्या सीरिजमधील टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू होता.