मोदींच्या राजकीय भवितव्यावर राहुल गांधींचा दावा; राऊत म्हणाले, ‘१७ सप्टेंबरनंतर उलगडा होईल’

महाराष्ट्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याचा दावा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता आहे का आणि मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदाची जबाबदारी कोणाकडे जाऊ शकते, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

या चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणखी धार मिळाली आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत राऊत यांनी मोदी आणखी काही काळच पंतप्रधान राहतील, असा दावा केला.

“१७ सप्टेंबरनंतर या गोष्टीचा उलगडा होईल. १७ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा पंतप्रधान म्हणून तो शेवटचा वाढदिवस असेल. तो त्यांनी आनंदात साजरा करावा,” असे राऊत यांनी म्हटले.

‘अमित शाहही गेले’ असा राऊतांचा दावा

मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव चर्चेत असल्याबाबत विचारले असता राऊत यांनी त्यावरही भाष्य केले. “अमित शाह कधीच प्रधानमंत्री होणार नाहीत. मोदी गेले, तो अमित शाह भी गये,” असा दावा त्यांनी केला.

विरोधकांना एवढा आत्मविश्वास कुठून?

राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विरोधकांना नेतृत्वबदलाबाबत काही माहिती मिळाली आहे की हे केवळ राजकीय अंदाज आहेत, याबाबत सध्या स्पष्टता नाही.

भाजपकडून नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी आणि संजय राऊत यांची वक्तव्ये सध्या राजकीय दावे म्हणूनच पाहावी लागतील.

दरम्यान, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत केंद्र सरकारविरोधातील विविध मुद्द्यांवर रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थी प्रश्न, पेपरफुटी, राम मंदिर देणगी यांसह विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे.

त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे नेतृत्व कोणाकडे जाणार, अमित शाह यांची भूमिका काय असणार आणि भाजपमध्ये खरोखर नेतृत्वबदल होणार का, हे प्रश्न सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र, भाजपकडून नेतृत्वबदलाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय किंवा स्पष्ट संकेत समोर आलेले नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत