मुंबई: एका बाईंनी हरवलं,बाईनी! अशी खोचक बोचक टीका जाहीरपणे माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री नारायण यांना उद्देशून माजी उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी काही दिवसांपुर्वी केली!…अनेकजण हसले, टाळ्या पिटल्या, समाजमाध्यमात भरभरून स्तुती केली गेली,.. हे सगळ ऐकताना, वाचताना संताप येत होता आणि म्हणूनच तत्क्षणीच मी दादांना रिट्विट केलं,” दादा जरा सांभाळून, महिला कुठेही कमी नसतात.
टीकेचा विषय राजकीय हाणामारीचा असला तरी त्यात स्त्री का यावी? बदला, सूड घेतानाही स्त्रीच का लागते? नेहमी शिव्या देतानाही आई बहिणीवरून लाखोली का वाहिली जाते? रस्त्यावर तर सोडा सभागृहातही स्त्री सन्मान का राखला जात नाही? मंत्री संजय राठोड यांचे भोवती फिरणारे एका तरुणीच्या मृत्यूचे प्रकरणातही असेच घडत आलेय! सर्वत्र या तरुणीचे फोटो नाव गाजले! तिच्या आईवडिलांनी आक्रोश केला तेव्हा जरा विषय तेव्हा थंडावला! तो विषय मागे जाऊन आजही राठोड मंत्री पदी राहिलेत.
मध्यंतरी कडवे हिंदुत्ववादी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार महिलेला भिकार जाहीरपणे अनेकदा म्हटले, पराकोटीचा राजकीय व्देष असू शकतो पण इतक्या खालच्या पातळीवर लोकप्रतिनिधी कसे काय जाऊ शकतात? प्रख्यात खासदार संजय राऊत ही च्यु… वरून शिविगाळ का करतात!? अनेक उदाहरणं देता येतील…की राजकीय सूडापोटो,जाती धर्म द्वेषातून महिलांन लक्ष्य केले जात आले आहे ती यादी खूप मोठी आहे! आपल्या सोईने जात धर्माचे अत्याचार बलात्काराला, लग्नाला रंग देण्याचे प्रयत्नही राजकारणात होत आले आहे.
कोपर्डी,खैरलांजी हे पराकोटीचे जातीय विद्वेषाचे विषय होते, काय शिक्षा झाली गुन्हेगारांना? बिल्किस बानो प्रकरणातील बलात्का-याची सुटका व त्याचा निर्लज्ज सत्कार हा तर भयंकर प्रकार आहे, अशा भयंकर विषयांवर नियंत्रण आणायला हवेच!पण इथेही राजकारण माती खाते.
महिला सक्षमीकरण कसं करणार आपण? कधी आत्मचिंतन केलंय का आपण?
एक ‘अ धीर ‘ मंत्री जाहीरपणे महिला सचिवांना बडबडत होते ,’तुम्ही आम्हाला काय खायचे हे सांगणार का?’ त्या अधिकारी सांगत होत्या ,साहेब तुमचे अधिकारी आम्हाला सांगतात, मिटिंग घेतात तेव्हा आम्ही फायनल करतो मॅटर” स्त्री समानता आपण सर्वत्र मागतोच आणि ती असायलाच हवी, पण पुरूष असो की स्त्री, पद आहे म्हणून आक्रमक, लागेल असं बोलणं तेही जाहीरपणे हे अयोग्यच काही महिन्यांपूर्वीच एका उपसचिव व मंत्री सचिवांना एका महिला अधिकाऱ्याला कंटाळा आलाय म्हणून गायला सांगितलं! असे अनेक प्रकार महिला सहन करतात. कुणी बोलतात कुणी मुकाट सहन करतात!
ते कशाला, जय श्रीराम अभिमानाने बोलणारे जय सीयाराम, जय सीताराम बोलायला मागत नाही! खरंतर सीतेविना राम अपुर्णच. खोट्या रूढी परंपरात अडकलेला समाज सुधारेल पण बहुसंख्य बुरसटलेले राजकारणी त्यांना तसं करू देणार नाहीत!
मागच्या सरकारच्या वेळी,मंत्री आदित्य ठाकरेना लक्ष्य करण्यासाठी ज्या दिशाचं नाव सामुहिक बलात्कार झाला म्हणून आ नितेश राणे वारंवार घेत होते, त्यांचे वडील ना नारायण राणेही जाहिरपणे बोलत होते. त्या मुलीला न्याय मिळणे आवश्यक पण तिच्या कुटुंबाला समाजात अवघड होईल असे काम करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना कुणी दिला? यावर सर्व पक्षीय महिलांनी ,नेत्यांनी एकत्र यायला हवे!
प्रत्येक आस्थापनेत, संस्थात कसं बोलावं वागावं याचं प्राथमिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
आपले नवे महिला धोरणं येणार आहे त्यावर अनेक महिला आमदारांनी एकत्र येऊन आपल्या भूमिका मांडल्या, त्यांना एकत्र आणण्याचे काम विधानपरिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी केले!त्यांचे अभिनंदन. एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे ज्याप्रमाणे हिरकणी कक्ष नेटक्या रूपात विधानभवनात तयार झालाय तसा राज्यभरात व्हावा. सर्वत्र मोठ्या संख्येने अद्ययावत स्वच्छतागृह असावेत. मान वेतन, समान अधिकार असावेत, पोलीस ठाण्यात तत्पर महिला सुरक्षा,तक्रार दाखल करण्यासाठी पुरेसे संवेदनशील कर्मचारी असावेत.
महत्त्वपूर्ण म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सक्षमीकरण व्हावे, कायदेविषयक मार्गदर्शन करणारे वकिल असावेत. अरे हो ,आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नाही ही खूपच गंभीर बाब आहे. आपण पुरूषी अहकारवाद, वर्चस्ववादातून कधी बाहेर येणार हा चिंतेचा विषय आहे.
महिला प्रत्येक पक्षाला, संघटना ताकद वाढवण्यासाठी लागतात पण तिला पद जबाबदारी देण्याची वेळ येते तेव्हा कोणते निकष लागतात,हाही पडद्यामागचा विषय, यावर महिलांनी पुढे यायला हवे.पत्रकारिता क्षेत्रात महिला विषयी आचारसंहितेवर काम होणे अपेक्षित आहे. महिला सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्याच्या घरात, संस्थात, कार्यालयात महिलांना विशाखा समिती म्हणजे काय, महिलांचे अधिकार सांगण्याची मानसिकता नसेल तर आजही आपण अपरिपक्व आहोत असेच म्हणावे लागेल.
सिनेमात, जाहिरातीत जसे प्राणी वापरण्यास काही निर्बंध आहेत तसेच निर्बंध स्त्रीदेह प्रदर्शन, विकृतीकरण करण्याविषयी यायला हवेत. खरं तर आपल्यात बाईकडे माणूस म्हणून पहाण्याची नजर तयार होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. तो दिवस आपल्या आयुष्यात येईल तेव्हा आपल्याला महिला दिन एक दिवस साजरा करण्याची गरज राहाणार नाही.