समाज हिंसा आणि द्वेषापासुन मुक्त करण्याची प्रेरणा मिळते
मुंबई: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा भक्तिभावाने संपन्न होत असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या भक्तिमय सोहळ्यास हजेरी लावली. त्या म्हणाल्या, “अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे मोठे साधन आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांना विविध महान गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळते, हे निश्चितच स्तुत्य आहे.” ८ आणि ९ मार्च रोजी वरळी येथील NSCI डोममध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत.
उत्सवामध्ये २१ महान गुरूंच्या पादुकांचे भव्य मंदिरे उभारण्यात आली असून, श्रद्धाळूंना पवित्र वातावरणाचा अनुभव घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकाशयोजना, भक्तिमय संगीत आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक चैतन्याने भारलेला आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “अध्यात्म हे मनःशांती व सामाजिक एकतेसाठी प्रेरणादायी ठरते. समाज हिंसा व द्वेषापासुन मुक्त व्हावी ही विविध गुरूंच्या शिकवणी आपल्याला उत्तम जीवन मूल्ये शिकवतात आणि समाजाला समतोल, सौहार्दपूर्ण जीवन जगण्याची दिशा दाखवतात. ‘सकाळ माध्यम समूहा’ने हा अनोखा उपक्रम राबवून भक्तांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणुन सकाळ माध्यम समुह व सकाळ टीमचे त्यांनी अभिनंदन केले.