शून्यापासून सुरुवात! भाजप सत्तेसाठी तावडे यांची रणनिती सुरू

महाराष्ट्र

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसह सहा राज्यांतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

पाचही राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्यासाठी पक्षाच्या बड्या नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawde यांच्या खांद्यावर केरळमध्ये पक्षाचा पहिला विजय मिळवण्याचे मोठे आव्हान देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची Kerala राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत केरळमध्ये भाजपला एकदाही विधानसभेत बहुमत मिळवता आलेले नाही. सध्या केरळ विधानसभेत भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे तावडे यांना शून्यापासून सुरुवात करून पक्षाची ताकद वाढवावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी मोठे ‘शिवधनुष्य’ मानली जात आहे.

केरळमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तावडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले आहे.

तावडे यांनी आपल्या संदेशात पंतप्रधान Narendra Modi यांचा ‘विकसित भारत, विकसित केरळम’ हा संदेश घराघरात पोहोचवण्याचे तसेच विकास आणि समावेशक प्रशासनाच्या चळवळीला बळ देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, तावडे यांची नुकतीच Maharashtra मधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यांनी अद्याप राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही.

यापूर्वी तावडे हे Bihar मध्ये भाजपचे प्रभारी होते. तेथे भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे आता केरळमध्येही तावडे कोणता चमत्कार घडवतात आणि शून्यापासून पक्ष किती जागांपर्यंत झेप घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.