‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

महाराष्ट्र राजकीय

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून अंतर्गत मतभेद आणि अविश्वास समोर येत असतो. आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री जे. टी. महाजन यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुलाबराव पाटील यांनी जे. टी. महाजन यांच्या कार्याचा गौरव करताना सहकार क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. जिल्हा दूध संघाची धुरा आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे असल्याचा संदर्भ देत त्यांनी दूध संघ चांगला चालवण्याचा सल्ला दिला. “कार्यक्रम केला तर कार्यक्रम होईल,” असा टोला त्यांनी मंगेश चव्हाण यांना लगावला.

सहकार क्षेत्रातील साखर कारखाने अडचणीत येत असल्याबद्दलही पाटील यांनी भाष्य केले. सहकारी साखर कारखाने बंद पडतात, मात्र खासगी कारखाने सुरू राहतात, असे सांगत त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या खासगी साखर कारखान्याचाही उल्लेख केला.

दरम्यान, दूध संघात तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी आल्याने दूध संकलन वाढल्याचे सांगत गुलाबराव पाटील यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उपलब्धतेत झालेल्या वाढीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’

गुलाबराव पाटील यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेत आलेले विधान म्हणजे “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील.” त्यांच्या या वक्तव्याने महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील संबंधांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

याचवेळी आपल्या वक्तव्यांबाबतही त्यांनी मिश्कील भाष्य केले. “माझ्या तोंडातून काहीही निघतं आणि बोललं जातं. मग टीव्हीवाले काहीही दाखवतात. त्यामुळे आता मी सांभाळून बोलतो,” असे ते म्हणाले. मात्र, त्याआधीच त्यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

याशिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना उद्देशून “बँकेकडे लक्ष ठेवा, नाहीतर बँक उचकून जाईल,” असा खोचक सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांपासून भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक राजकीय स्पर्धा अनेकदा उघडपणे दिसून आली आहे. त्यातच आता गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत