डोंबिवली: शहरातील गोग्रासवाडी परिसरात राहणाऱ्या एका एमएस्सी विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या खात्यात एवढी मोठी रक्कम कशी आली, असा सवाल करत विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली; मात्र कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा आरोप पुढे येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
निधी तिवारी (नाव बदललेले) ही कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची मैत्रीण चांदनी सिंह ही RBL Bank मध्ये कार्यरत आहे. बँकेचे टारगेट पूर्ण करण्यासाठी खाते उघडण्याची विनंती करत चांदनीने निधीला विश्वासात घेतले आणि तिची तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली. खाते उघडण्यासाठी काही रक्कमही दिल्याचे सांगितले जाते.
काही दिवसांनी निधीला धक्का बसला—तिच्या एका खात्यात 2.60 कोटी रुपये आणि दुसऱ्या खात्यात 10 लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती तिला मिळाली. या व्यवहारांबाबत विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने तिने स्वतः चौकशी सुरू केली.
‘उत्तराखंड कनेक्शन’ उघड
प्राथमिक माहितीनुसार, उत्तराखंड येथील नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली रक्कम निधीच्या खात्यात वळवण्यात आली आणि त्यानंतर ती पुढे वापरली गेली. या रॅकेटमध्ये उल्हासनगर येथील एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निधीने ही सर्व माहिती पोलिसांना दिली आहे.
मनसेची उडी, पोलिसांवर सवाल
गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत असूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. यानंतर तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “सायबर गुन्ह्यांवर मोठ्या घोषणा होतात; मग इतक्या मोठ्या व्यवहारानंतरही गुन्हा का दाखल होत नाही?” असा सवाल उपस्थित केला.
संशयिताला चौकशीसाठी बोलावूनही कारवाईविना सोडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
रामनगर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी संबंधित तरुणीचा अर्ज प्राप्त झाल्याचे सांगत चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र कोट्यवधींचे व्यवहार होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मनसेच्या हस्तक्षेपानंतर तपासाला गती मिळते का, तसेच विद्यार्थिनी आणि फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.