पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

महाराष्ट्र

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे.

१२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात

प्राथमिक व माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल. दरम्यान, कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळा सुटीत शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात राहून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. जेणेकरून पटसंख्या कमी होणार नाही, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढणार नाही, हा त्यामागील हेतू आहे.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सत्र परीक्षा उरकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती समजणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लक्ष देणे सोयीचे होणार आहे. परीक्षा संपल्यानंतर निकाल तयार करून १ मे रोजी तो प्रसिद्ध होईल. १ मे ते ११ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे.