मुंबई: महाविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा आव्हान उभं राहणार आहे. विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आता थेट तीन खासदारकीच्या जागा आघाडीकडे जाण्याची शक्यता कमी झाली आहे.
राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होत आहेत. यातील चार जागा महाविकास आघाडीकडे होत्या, पण विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे आता फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकणार आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादीच्या फौजिया खान देखील निवृत्त होत आहेत. महायुतीकडून रामदास आठवले, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील निवृत्त होत आहेत.
महाविकास आघाडीचे चार खासदार 2020 मध्ये राज्यसभेत विजयी झाले होते. मात्र आता केवळ महाविकास आघाडी एकत्र राहिली तर फक्त एकच खासदार राज्यसभेत जाऊ शकतो. दुसरीकडे महायुतीकडे सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार का?
शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होत असल्याने ते पुन्हा निवडणुकीत उतरतील की नाही, हा निर्णय तेच घेणार आहेत. आघाडीतील फक्त एक जागा उपलब्ध असल्यामुळे त्यांचेच नाव आघाडीवर पुढे येण्याची शक्यता आहे.
विजयासाठी आवश्यक संख्याबळ
राज्यसभेच्या उमेदवारांसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. उमेदवाराला विजयी होण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 16, राष्ट्रवादीकडे 10 आणि शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. एकत्रित संख्याबळ 46 असून, त्यामुळे फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकेल.