मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि विकासात्मक भूमिकेचा प्रसार देशभर व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देशव्यापी प्रतिकात्मक स्मृती-कलश (विचार कलश) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख पवित्र नद्या व धार्मिक स्थळांना भेट देणार आहे.
या कलश यात्रेमुळे देशभरातील कार्यकर्ते व समर्थकांना अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला अभिवादन करण्याची आणि त्यांच्या विचारांशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.
मंगळवारी बारामती येथील निवासस्थानी विधिवत पूजनानंतर पार्थ अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे हा स्मृती-कलश सुपूर्द केला.
यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशभरातील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा प्रसार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ही कलश यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेची सुरुवात दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात पूजन करून करण्यात येणार असून, त्यानंतर हा कलश उत्तराखंडमधील हरिद्वार येथील हर की पौडी, उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील संगम, वाराणसीतील मणिकर्णिका घाट यांसह बिहार, झारखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत विविध राज्यांत नेण्यात येणार आहे. या ठिकाणी श्रद्धांजली सभा व संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कलश यात्रेद्वारे अजितदादा पवार यांच्या विकासकार्यांचा, शेतकरी हिताच्या धोरणांचा आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
या देशव्यापी यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणार आहेत.