मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिकबाबत सरकार कठोर; जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही
चिपळूण: कोकणच्या निसर्गावर आणि जनतेच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आणि ठाम भूमिका घेतली आहे. चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपन्यांबाबत बोलताना, “कोकणात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकासाच्या नावाखाली कोकणचा निसर्ग आणि नागरिकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या शक्तींविरोधात सरकार कठोरात कठोर निर्णय घेईल, असा निर्धार व्यक्त केला.सभेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी ही निवडणूक उमेदवारांची नसून कार्यकर्त्यांची असल्याचे ठामपणे सांगितले. पक्षाचा खरा कणा कार्यकर्ता असून, शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे सर्व कार्यकर्तेच पक्षाची ताकद आहेत, असा संदेश त्यांनी दिला.
कोकण आणि शिवसेनेचे भावनिक नाते उलगडताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणात घट्ट रुजलेली आहे. नारळी–पोफळी, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर सरकारचा भर आहे.महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की ही योजना कधीही बंद होणार नाही. दरवर्षी सुमारे 45 हजार कोटी रुपयांचा खर्च करून कोट्यवधी महिलांना थेट आर्थिक लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना, पिक विमा सुलभ योजना, कर्जमाफीसाठी समिती, अतिवृष्टीसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज यांचा उल्लेख करत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
मुख्यमंत्री सहायता निधीतून हजारो रुग्णांना मदत मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगत, “एका सहीमुळे जर एखाद्याचा जीव वाचत असेल, तर त्याहून मोठे समाधान नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.कोकण विकासासाठी मुंबई–अलिबाग–सिंधुदुर्ग–गोवा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण, पर्यटन विकास, रस्ते व रेल्वे प्रकल्प यांचा मास्टरप्लॅनही त्यांनी मांडला.मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिकसारख्या प्रदूषणकारी उद्योगांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, लोकांचे आरोग्य सर्वोच्च असून जे उद्योग आरोग्यास धोका ठरतील त्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही.शेवटी 7 तारखेला धनुष्यबाण आणि कमळाच्या चिन्हावर मतदान करून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत, रत्नागिरी जिल्ह्यावर महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या सभेला उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.