त्यांनी धनंजय मुंडेंसाठी पर्याय शोधला पण बाबरी मुंडेंना काय मिळणार? एका दगडात तीन पक्षी….

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या दौऱ्याचं विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. हा प्रवेश इतर राजकीय प्रवेशांएवढा साधा-सरळ नाही. अनेक धागेदोरे आहेत जे समजून घेणं आवश्यक आहे.

कोण आहेत बाबरी मुंडे

युवा नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. गोपीनाथ मुंडेंच्या निधानानंतर ते भाजपमध्ये पंकजा मुंडेंशी एकनिष्ठ राहिले. अगदी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. परंतु मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि बाबरी मुंडेंचं कुटुंब पंकजांपासून दुरावलं. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघातून बाबरी मुंडे एकप्रकारे अपक्ष उभे होते. मात्र त्यांना पंकजा मुंडेंची मदत झाली नाही, त्यामुळे ते नाराज झाले. बीडमध्ये ओबीसी-विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालं होतं. तरीही प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातून ५ हजार ८९९ मतांनी विजय मिळवला. सोळंके पाचव्यांदा आमदार झाले आणि मतदारसंघावर त्यांचं असलेलं वर्चस्व सिद्ध झालं. या निवडणुकीनंतर राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे पंकजा मुंडेंपासून दूरावले आणि प्रकाश सोळंकेंच्या जवळ गेले.

नेमकं ठरलं काय

स्वतःच्याच मतदारसंघातल्या प्रतिस्पर्ध्याला स्वपक्षात घेणं तशी सोपी गोष्ट नाही. ती हिंमत प्रकाश सोळंकेंनी दाखवली खरी पण त्यामागचं राजकीय गणितं काय आहेत, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. भविष्यात प्रकाश सोळंके माजलगाव मतदारसंघ बाबरी मुंडेंसाठी सोडायला तयार आहेत का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा शब्द दिला आहे का? किंवा पक्षाकडून मोठं पद मिळवून देण्याचा शब्द दिलाय? हे येणारा काळच सांगेल. पण काहीतरी मिळाल्याशिवाय हा प्रवेश होणं शक्य नाही.

धनंजय मुंडेंना पर्याय

२०१२ मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परळी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे बंड त्यांनी केलं होतं. राज्यातले बलाढ्य नेते आणि स्वतःचे काका असलेले गोपीनाथ मुंडे यांची साथ धनंजय यांनी सोडली होती. अर्थात ते भाजपचे आमदार असल्याने त्यांनी यथावकाश पक्षप्रवेश केला. त्यापूर्वी त्यांचे वडील पंडित मुंडे आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

पुढे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना हवं ते दिलं. पक्षांतर्गत विरोध असतानाही धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर घेतलं, पुढे २०१५ मध्ये विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं, २०१९ मध्ये कॅबिनेट मंत्री केलं, पुन्हा अडीच वर्षांनंतर भाजपसोबत जाऊन मंत्रिपदाची संधी दिली. २०२४ मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हाही कॅबिनेट मंत्री केलं. अत्यंत कमी वेळेत धनंजय मुंडेंना अजित पवारांनी भरभरुन दिलं.

मात्र याच धनंजय मुंडेंमुळे अजित पवार, त्यांचा पक्ष अडचणीत सापडला. स्व. संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे यांचा उजवा हात वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे. यासह वाल्मिक आणि त्याच्या गँगने अनेक खून करुन पचवले. कृषी विभागात शेकडो कोटींचा घोटाळा केला.. हे सगळं धनंजय मुंडेंच्या पाठबळाशिवाय शक्य नाही, हे उघड आहे. त्यामुळे अजित पवार हळूहळू धनंजय मुंडेंना दूर लोटत आहेत का, असा प्रश्न पडतोय.

बाबरी मुंडेंना राज्य पातळीवरचं पद

धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात अंतर्गत वाद आहे. त्याच प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वाखाली बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. हा प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत बीडच्या वडवडणी येथे होतोय. प्रवेशाच्या एकाही बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो नाही. त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रणदेखील नाही. हे सगळं अजित पवारांच्या डोळ्यासमोर घडतंय. धनंजय मुंडेंसारख्या पक्षातल्या मोठ्या नेत्याला असं डावलणं सोपी गोष्ट नाही. यावरुन अजित पवार हे बाबरी मुंडेंना बळ देऊ पाहात आहेत, हे स्पष्ट आहे. भविष्यात बाबरी मुंडेंना पक्षात राज्य पातळीवरचं एखादं पद मिळू शकतं, असं बोललं जातंय. एकीकडे पंकजा मुंडेंना धक्का, दुसरीकडे धनंजय मुंडेंना साईड कॉर्नर करणं; एवढं करुन वंजारा समाजही नाराज झाला नाही पाहिजे, असं हे राजकीय गणित अजित पवार करु पाहात आहेत.