वसंतदादांनी तेव्हा शरद पवारांना फक्त मुख्यमंत्रीच केलं नाही तर ‘हा’ आशीर्वादही दिला…

महाराष्ट्र राजकीय

सोलापूर: वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवार यांनी त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार पाडले होते. पण त्यानंतर दहा वर्षांनी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांना केवळ मुख्यमंत्रिपदच दिले नव्हते, तर राजकारणात इथून पुढे सर्व शक्ती आणि ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करां, ते महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील, असा आशीर्वादही दिला होता, त्यावेळी झालेल्या सभेचा मी साक्षीदार आहे, अशी आठवण सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच आपण वसंतदादांचे सरकार पाडले. पण त्यानंतर दादांनीच आपल्याला मुख्यमंत्रिपद दिले होते, अशी आठवण सांगितली. त्यावर शहाजीबापू पाटील बोलत होते. ते म्हणाले, ज्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घेतलेले निर्णय असतात, हे मी गुवाहाटीवरून आल्यानंतरही तो संदर्भ दिला होता. त्यावेळी राजकारणाची गरज आणि राजकीय वातावरण म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावेळी ते पाऊल उचलेले होते.

वसंतदादा पाटील यांनी दहा वर्षांनी शरद पवार यांना केवळ मुख्यमंत्रिपदच दिले नाही तर अमराईमध्ये प्रचंड मोठा मेळावा घेतला. त्या मेळाव्यातील वसंतदादांचे भाषण ही स्वतः ऐकले आहे. मी स्टेजवर कोपऱ्यात बसलो होतो. त्या मेळाव्यात वसंतदादांनी ‘राजकारणात इथून पुढे सर्व शक्ती आणि ताकद शरद पवार यांच्या पाठीमागं उभं करा. तेच यापुढील महाराष्ट्राचं भवितव्य घडवतील,’ असा आशीर्वादही दिला होता, अशी आठवणही शहाजीबापूंनी सांगितली.

ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी दहा वर्षांनी वसंतदादा पाटील यांनी शरद पवारांना पाठिंबा दिलाच. पण, वसंतदादांचा आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार यांच्या पाठीशी होता. राजकारणात काही घडामोडी घडत असतात, त्यानुसार त्यावेळी घडलेल्या त्या घडामोडी होत्या.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीहीअनेकांना राजकीयदृष्ट्या पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. (स्व.) आर. आर. पाटील, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारख्या अनेकांना त्यांनी संधी दिली आहे.

लक्ष्मण ढोबळे हे आपल्या पंढरपूर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. मी त्यावेळी कॉलेजला होतो. शरद पवारांनी एका क्षणात ढोबळेंना उमेदवारी दिली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोचवले. त्यांचे नेतृत्व वाढविले पवारांनी राज्याच्या राजकारणात अनेक माणसं वाढवली आणि उभी केली, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात माणसं उभी करण्यात किंवा घडविण्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि विशेष करून बाळासाहेब ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

बाळासाहेब ठाकरे तर किमयागारच होते. पानटपरीवरचा माणूसही त्यांनी कुठल्या कुठे नेला. त्यांनी भडक भाषेत दिलेला आशीर्वाद प्रचंड ऊर्जा देऊन जात होता. त्यात नारायण राणे, मनोहर जोशी, आज एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद यातूनच उभं राहिले आहे आणि ते वाढतच चालले आहे.